‘आणीबाणी’ निमित्त सरकार विशेष अधिवेशनाच्या विचारात   

नवी दिल्ली : आणीबाणीच्या घटनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सरकार २५-२६ जून रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार करत असल्याचा दावा काँग्रेसने गुरुवारी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वास्तव आणि महत्त्वाच्या मुद्द्यांपासून  लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यम प्रभारी जयराम रमेश यांनी सांगितले.
 
भाजपने पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना लक्ष्य केले पाहिजे. मात्र, त्यांना फक्त काँग्रेसवर टीका करण्यात रस आहे, असेही ते म्हणाले.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यापासून आम्ही संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करत आहेत. १० मे रोजी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांनी यासंदर्भात पंतप्रधानांना पत्रदेखील लिहिले होते. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नाही, असेही ते म्हणाले.
 
देशात आणीबाणीच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त २५-२६ जून रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा विचार केला जात आहे, असेही ते म्हणाले. पण, मागील ११ वर्षांपासून देश अघोषित आणीबाणीत आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अद्यापही सापडलेले नाहीत, याबाबत सरकार कोणतेच भाष्य करत नाही. पाकिस्तानबरोबरील लष्करी संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीत मध्यस्थी का केली? १९ जून २०२० रोजी त्यांनी चीनला क्लीन चिट का दिली? असा सवाल करतानाच केंद्र सरकारचा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लक्ष विचलित करत असल्याचा आरोप रमेश यांनी केला. 
 
सध्याच्या समस्या आणि आव्हानांबद्दल बोलण्याऐवजी पंतप्रधानांना ५० वर्षांपूर्वी काय घडले, यावर चर्चा करायची आहे. भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही आण्विक राष्ट्रे आहेत. देशासमोर चीन आणि पाकिस्तानचे मोठे आव्हान आहे. यावर, विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी ते अन्य विषयांमध्येच अधिक रस दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना का पकडले गेले नाही? असा प्रश्नही त्यांनी विचारला. सरकारने पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना लक्ष्य करायला हवे होते. मात्र, भाजपला फक्त काँग्रेसला लक्ष्य करण्यात आणि त्यांच्यावर टीका करण्यात रस आहे, असे रमेश म्हणाले.
 

Related Articles